रानडुकरांनी नुकसान केलेल्या उसाचे पंचनामे न केल्याने खंडपीठात अवमान याचिका
-
Saturday, August 11, 2012 AT 01:15 AM (IST)
औरंगाबाद - रानडुकरांपासून उसाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून याचिकाकर्ते अण्णासाहेब तौर (रा. ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत खंडपीठाने उसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. परंतु पंचनामे न केल्यामुळे दाखल झालेल्या अवमान याचिकेत खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.
दरम्यान, न्यायालयाने मुख्य वनसंरक्षक, औरंगाबाद यांना याचिकाकर्त्याचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. 8 ऑगस्ट 2012 रोजी मुख्य वनसंरक्षक यांनी त्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला. यानुसार याचिकाकर्त्यास व इतर शेतकऱ्यांना सरासरी 14 टन प्रति एकर उसाचे नुकसान झाले. ते नुकसान शासन निर्णय 2 जुलै 2010 प्रमाणे देय ठरते असे नमूद केले आहे. तसेच याचिकाकर्त्यानी शासन निर्णय 2 जुलै 2010ला सुद्धा आव्हान दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने उसाला रानडुकरांमुळे झालेल्या नुकसान भरपाईची 400 रुपये प्रति टन रक्कम अत्यल्प आहे. नुकसान भरपाई ही उसाच्या चालू भावाप्रमाणे मिळावी. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. व्ही. डी. साळुंके व ऍड. शंभुराजे देशमुख काम पाहत आहेत.