विलासराव देशमुख यांचं निधन मनाला अस्वस्थ करणारं - भोसले
-
Saturday, August 18, 2012 AT 02:00 AM (IST)
सातारा - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या समाज जीवनातलं एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. गावचे सरपंच ते केंद्रीय मंत्री त्यांचा हा कर्तृत्व प्रवास विस्मयकारक आहे. त्यांचं जाणं मनाला अस्वस्थ करणारं आहे, असे प्रतिपादन किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे मंगळवारी (ता.14) अल्पशा आजाराने निधन झाले. देशमुख यांना किसन वीर परिवाराच्यावतीने नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबत बोलताना श्री. भोसले म्हणाले, की विलासराव देशमुख यांच्या जाण्याने बहुजन समाज आणि विशेषतः महाराष्ट्र एका कर्तृत्वसंपन्न, बहुश्रुत आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाला मुकलेला आहे. त्यांच्याशी वैयक्तिक माझा एक सहकारी आणि चाहता म्हणून गेल्या अनेक वर्षांचा दृढ संबंध होता. किसन वीर कारखान्याचा कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना त्यांचं सातत्याने मार्गदर्शन मिळालं. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे आणि चांगल्या गोष्टींना मनापासून दाद देणे हे दोन्हीही गुण त्यांच्या ठायी होते.